पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘शहरात वाहतुकीचा प्रश्न बिकट होत असून, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी कात्रज ते येरवडा हा भुयारी मार्ग महत्त्वाची भूमिका बजाविणार आहे. दोन्ही बाजूंनी प्रत्येकी तीन मार्गिका करण्याचे नियोजन आहे.’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवानिमित्त अजित पवार यांनी पुणे महापालिकेला भेट देऊन पुणेकरांना शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले की, ‘पुणे शहराचा विस्तार होत असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला असून भुयारी मार्ग यावर उपाय आहे. तो करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरातील विविध भागांतील नागरिकांनादेखील या रस्त्याचा वापर करता यावा, यासाठी सुरुवातीला केवळ दोन ठिकाणी बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला जाणार होता. मात्र, आता यामध्ये वाढ करावी लागणार आहे.’ असेही अजित पवार यांनी सांगितले.

दैनंदिन कामांवर परिणाम नाही
‘भुयारी मार्ग तयार करताना अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जात असल्याने त्याचा शहरातील दैनंदिन कामांवर काहीही परिणाम होणार नाही. एका वेळी दोन्ही बाजूंनी काम सुरू करून हे काम मार्गी लावता येणार आहे. या रस्त्याचे काम कमी वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी चार ठिकाणांवरून कामाला सुरुवात करण्याचे नियोजन आहे. ये-जा करण्यासाठी दोन्ही बाजूंनी तीनपदरी मार्ग केले जाणार असून याच्या बाजूनेच मेट्रो प्रकल्पाचा चौथा मार्ग करता येईल का, याचादेखील अभ्यास करण्यात येत आहे.’ असे पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचा विस्तार अधिक होणार असून, २०५४ पर्यंत पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या पुण्यापेक्षा अधिक असेल. या दोन्ही शहरांतील नागरिकांच्या पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन या गरजा भागविण्यासाठी आतापासून नियोजन करावे लागणार आहे. मुळशी धरणातील पाणी पिण्यासाठी वापरण्यास मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे.’ असे पवार म्हणाले.







