शिरूर : शिरूर तालुक्यातील ढाकेवस्ती, कवठे यमाई येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यावर हल्ला करून 16 शेळ्या व रोकड मिळून तब्बल 90 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नाथा भगवंता वागदरे (वय 65, व्यवसाय शेती व मेढपाळ, रा. ढाकेवस्ती, कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या फिर्यादी वरून शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 12.05 ते 1.00 वाजताच्या दरम्यान घडली.

फिर्यादी व त्यांची पत्नी लिलाबाई हे त्यांच्या शेतातील पत्राशेडमध्ये झोपलेले असताना चार अज्ञात इसमांनी अचानक हल्ला केला. चोरट्यांनी लोखंडी गज व लाथाबुक्क्यांनी दोघांना मारहाण केली. त्यानंतर चोरट्यांनी फिर्यादींच्या शर्टातील खिशातून 5,000 रुपये रोकड काढून घेतली व दोघांचे हातपाय बांधून ठेवले. “आरडा ओरड केल्यास ठार मारू” अशी धमकी देत त्यांनी पत्राशेडमधील 10 शेळ्या आणि एक बोकड पांढऱ्या रंगाच्या पिकअप वाहनात भरून चोरून नेल्या.
या घटनेत चोरट्यांनी एकूण 90 हजार रुपयांची चोरी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो .स.ई. पवार हे करीत आहेत.
दरम्यान, ग्रामीण भागात वाढत्या मेंढपाळ व शेतकऱ्यांवरील जबरी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







