पुणे: दौंड तालुक्यातील देलवडी (Daund News) अन् नाथचीवाडी तसेच खुटबाव (Pune News) अशा दोन्ही गावांना जोडल्या जाणाऱ्या (वांझरवाडी ते इनामके वस्ती) रस्त्यावर धोकादायक खड्डे व दरम्यान काही ठिकाणी झालेल्या अर्धवट कामांमुळे प्रवास जीवघेणा बनला आहे. अपघातांचे सत्र वाढले आहे. हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असून रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशी मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

रस्त्यावरून भीमा पाटस कारखाना, दौंड साखर कारखाना, ओंकार शुगर यवत कारखान्याच्या दिशेने या मार्गावरून जड वाहतूक सुरू असते. कंटेनर, गुऱ्हाळघरांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची संख्या मोठी आहे. दौंड तालुक्याच्या हद्दीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागायती क्षेत्र असल्यामुळे दलदलयुक्त भाग जादा आहे. दलदलयुक्त भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

धोकादायक खड्ड्यांमुळे चार चाकी गाड्यांचा मेंटेनन्स वाढला. रात्रीच्या वेळी दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण जादा आहे. कोट्यवधींच्या विकास कामांचा बोलबाला तालुक्यात सुरू आहे परंतु अवघ्या 1000 ते 1500 फुटांच्या रस्त्याने लाखो रुपयांच्या गाड्यांचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा आहे. अनेकदा किरकोळ अपघात सुद्धा झाले आहे. रस्त्याच्या कामाचा कुठेही दर्जा नाही. ऊस वाहतूक करणारी वाहने अनेकदा प्रवाशांच्या अंगावर उलटली असल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच संबधित रस्त्यावर कॅनॉल चारी साठी वापरलेले सिमेंट पाईप पूर्ण फुटले असल्याने फक्त मोटार सायकल जाईल इतकीच जागा शिल्लक आहे. त्यामुळे संबधित विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कुठलीही अनुचित घटना घडल्यास प्रशासकीय अधिकारी जागे होणार का? असा संतप्त सवाल प्रवासी व नागरिक करू लागले आहेत.

“या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. उंचवट्यामुळे अवजड वाहने प्रवासी व शेजारील घरांवर उलटल्याच्या घटना घडत आहेत. पावसाचे पाणी तुंबत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तत्काळ गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
-दादासो तनपुरे – स्थानीक नागरीक







