ajit pawar death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीसह संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली असतानाच, या घटनेभोवती आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मृत्यूच्या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी ऐरणीवर आली आहे.

रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये अजित पवार यांच्या अचानक जाण्याने आपण मानसिकदृष्ट्या हादरल्याचं नमूद केलं आहे. “कसे झाले, का झाले, काहीच कळत नाही. इतक्या मोठ्या नेत्याचा अंत असा अचानक व्हावा, हे मनाला पटत नाही,” असं त्या म्हणतात. विशेषतः प्रवासादरम्यान घडलेल्या घटनांकडे लक्ष वेधत त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. नियोजित वेळेत असलेल्या फ्लाइटसाठी दोन्ही पायलट एकाचवेळी उशिरा पोहोचणे, अचानक पायलट बदल आणि त्यानंतरच्या सुरक्षा प्रक्रियेबाबतची माहिती सार्वजनिक न होणे या सगळ्यांमुळे ‘घात की अपघात?’ असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण घटनेची सखोल, पारदर्शक चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. (ajit pawar death)
या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आणखी एक विषय चर्चेत आला. सुनेत्रा पवार यांचा घाईघाईत पार पडलेला शपथविधी. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ का घेण्यात आली, याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भाजप नेतृत्वाला संभाव्य राजकीय पेच टाळायचा होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावर चर्चा सुरू असताना, अजित पवार यांच्या निधनानंतर सत्ताकेंद्र शरद पवारांकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. हे टाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे तातडीने पक्षाची सूत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं सांगितलं जातं.
राष्ट्रवादीतील काही कार्यकर्त्यांनी या शपथविधीवर टीका केली असली, तरी आमदारांमधील अस्वस्थता, अफवा आणि नेतृत्वाबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी हा निर्णय अपरिहार्य होता, असं पक्षातील निकटवर्तीयांचं म्हणणं आहे.
एकीकडे अजित पवार यांच्या मृत्यूभोवती चौकशीची मागणी, तर दुसरीकडे सत्तेतील तातडीचे निर्णय या दोन्ही घडामोडी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या ठरणार आहेत.






