मुंबई: पश्चिम आशियातील इस्रायल आणि इराणमधील (War Impact) युद्धानंतर भारताला सर्वाधिक गॅस पुरवठा करणाऱ्या कतारने ‘फोर्स मेज्योर’ घोषित केल्यामुळे देशात नैसर्गिक वायूचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किमती भडकण्याची चिन्हे आहेत.

कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी (LNG) प्रकल्पावर इराणी ड्रोन हल्ला झाल्याने तिथले उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे कतारने ‘अपरिहार्य परिस्थिती’ म्हणजेच ‘फोर्स मेज्योर’ अंतर्गत भारताला होणारा गॅस पुरवठा तूर्तास थांबवला आहे. भारताच्या एकूण एलएनजी आयातीपैकी ४० टक्के हिस्सा एकट्या कतारकडून येतो. त्यामुळे भारतासाठी ‘ऊर्जा संकट’ निर्माण होण्याची शक्यता आहे.
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ हा सागरी मार्ग आता मृत्यूचा सापळा बनला आहे. भारताच्या एकूण आयातीपैकी 50% तेल याच मार्गाने येते. भारताचा 54% गॅस पुरवठा या मार्गावर अवलंबून आहे. इराणने या मार्गावर नियंत्रण मिळवल्याने जहाजांचा विमा हप्ता आणि वाहतूक खर्च अनेक पटींनी वाढला आहे, ज्याचा परिणाम किमतींवर झाला आहे.
भारताची प्रमुख कंपनी ‘पेट्रोनेट एलएनजी’ने गॅस पुरवठ्यात 10 ते 40 टक्क्यांपर्यंत कपात केली असून गाड्यांचे इंधन आणि पाईप गॅसच्या किमती वाढू शकतात. गॅस महागण्याची शक्यता आहे. अनेक गॅस आधारित वीज प्रकल्पांना फटका बसल्याने विजेचे संकट ओढवू शकते.
पुरवठ्यातील ही तूट भरून काढण्यासाठी भारत आता ‘स्पॉट मार्केट’मधून महागडा गॅस खरेदी करण्याच्या तयारीत आहे. पण यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवणे सरकारसाठी मोठे आव्हान असेल.






