धाराशिव: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आ हे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणात सरकारच्या जवळच्या लोकांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. पेपरफुटी करणाऱ्यांना पैशांच्या जोरावर वाचवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

MPSC परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने पुण्यात आत्महत्या केल्यानंतर रोहित पवार त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात गेले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी आणि मजुरांच्या कुटुंबातील अनेक मुले स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, त्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, कथित पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच मागील पदाधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

या प्रकरणावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. MPSC ही स्वतंत्र संस्था असून पेपरफुटीच्या प्रकरणासाठी शिक्षणमंत्र्यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.






