मुंबई : राज्यातील शिक्षक भरतीसाठी सध्या पवित्र पोर्टलवर उमेदवारांची मोठी गर्दी होत आहे. तब्बल 30,209 शिक्षक आणि शिक्षणसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, उमेदवारांना 11 ऑगस्ट 2026 पर्यंत पसंतीक्रम भरून तो लॉक करायचा आहे. मात्र एकाच वेळी मोठ्या संख्येने उमेदवार पोर्टलवर लॉगिन करत असल्याने सर्व्हरवर ताण आला आहे. त्यामुळे अनेकांना वेबसाइट उघडण्यात अडचणी येत आहेत.

राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, आदिवासी विकास विभाग, शासकीय विद्यालये तसेच खासगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त शिक्षक पदांसाठी ही भरती केली जात आहे. पात्र उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार पद आणि संस्थांचा क्रम निवडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

या भरतीसाठी स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेले 1,70,108 उमेदवार पात्र आहेत. त्यामुळे उपलब्ध जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

यापूर्वी या प्रक्रियेसाठी 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. शासनाच्या नियमानुसार रिक्त जागा आणि आरक्षणाचा विचार करून सुमारे 80 टक्के पदांवर नियुक्ती प्रक्रिया राबवली जात आहे.
उमेदवारांना 6 ते 11 ऑगस्ट या कालावधीत पसंतीक्रम भरायचा आहे. त्यासाठी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या पवित्र पोर्टलवर लॉगिन करून प्रथम प्राधान्यक्रम आणि त्यानंतर पदनिहाय पसंतीक्रम नोंदवणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास पुढील निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
दरम्यान, पोर्टलवर वारंवार अडचणी येत असल्याने अनेक उमेदवारांमध्ये नाराजी आहे. दरम्यान, सर्वांना पसंतीक्रम भरता यावा, यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.







