नवी दिल्ली : भारताने 7.8 टक्के विकासदर नोंदवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. जगभरात युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील अडथळे आणि आर्थिक अनिश्चितता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात पंतप्रधानांनी Instagram वर एक व्हिडिओ शेअर केला.

आपल्या संदेशात मोदी यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीचा उल्लेख केला. अनेक देशांमध्ये संघर्ष सुरू असून त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. तसेच 2020 मधील कोविड संकटानंतरही आर्थिक स्थैर्याबाबत अनेक आव्हाने कायम असल्याचे त्यांनी सांगितले. अशा परिस्थितीत भारताने मिळवलेला 7.8 टक्के विकासदर हा देशासाठी महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.


मोदी यांनी नागरिकांच्या प्रयत्नांचे आणि दृढनिश्चयाचेही कौतुक केले. देशाची प्रगती कायम ठेवण्यासाठी नागरिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानांनी नागरिकांना काही महत्त्वाचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक काम नसेल तर परदेश प्रवास टाळावा, असे त्यांनी म्हटले. तसेच गरज नसताना सोन्याची खरेदी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
यावेळी मोदी यांनी विरोधकांवरही टीका केली. काही लोक देशाच्या प्रगतीमुळे निराश झाले असून ते चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या आव्हानांचा भारतावरही परिणाम होत असताना देशाची अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. त्यामुळे या विकासदराकडे देशाच्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब म्हणून पाहिले जात आहे.







