मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेच्या सारीपाटावर हालचाली वेगवान झाल्या आहेत. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. 13 मे रोजी कार्यकाळ संपणाऱ्या या जागांसाठी आतापासूनच राजकीय पक्षांमध्ये ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः भाजप आणि महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता, एका आमदाराला निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे असलेले एकूण संख्याबळ पाहता त्यांचे 8 उमेदवार निवडून येऊ शकतात. यामध्ये सर्वाधिक 5 जागा भाजपच्या वाट्याला, 2 शिवसेना (शिंदे गट) आणि 1 जागा राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाट्याला येण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता त्यांचा केवळ एकच उमेदवार सुरक्षितपणे निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 अतिरिक्त मतांची गरज भासणार आहे.
मैदानातून कोण निवृत्त होतंय?
यावेळेस निवृत्त होणाऱ्या नेत्यांची यादी पाहिली तर त्यात राज्याच्या राजकारणावर पकड असलेल्या दिग्गजांचा समावेश आहे:
-
उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट) आणि राजेश राठोड (काँग्रेस).
-
नीलम गोऱ्हे (शिवसेना – शिंदे गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट) आणि भाजपचे चार शिलेदार – गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि रमेश कराड.
भाजपमध्ये सध्या निवृत्त होणाऱ्या चार आमदारांशिवाय नव्या चेहऱ्यांची मोठी यादी आहे. यामध्ये केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांची नावे आघाडीवर आहेत.
उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी आणि गोपीचंद पडळकर यांसारख्या प्रभावशाली नेत्यांचा कार्यकाळ संपत असल्याने, सभागृहाचा चेहरामोहरा बदलण्याची दाट शक्यता आहे.






