दिल्ली: दिल्लीत शुक्रवारी घडलेल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. नवी दिल्लीतील विठ्ठलभाई पटेल हाऊस येथे झालेल्या या बैठकीत CJPचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मात्र, बैठकीचा अधिकृत आणि सविस्तर अजेंडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, CJPच्या प्रतिनिधींनी चर्चेत सहभागी होण्यापूर्वी सरकारसमोर दोन प्रमुख अटी मांडल्या होत्या. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, तसेच अलीकडील परीक्षांमधील गोंधळामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य ती भरपाई दिली जावी, अशी त्यांची मागणी होती. या दोन मुद्द्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.

तथापि, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी CJPने कायम ठेवली असून, तीच आपल्या आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे पक्षाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले आहे.
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचे सरकारने गांभीर्याने ऐकून घेतले आहे. त्यांच्या तीन प्रमुख मागण्या आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सुचविलेल्या पाच सूचना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नड्डा यांनी पुढे सांगितले की, या बैठकीनंतर सरकारकडून संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. त्यानंतर शनिवारी दुपारी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींशी पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, सरकारची भूमिका आणि चर्चेतील निष्कर्ष त्यांच्यासमोर मांडले जातील.
दरम्यान, या बैठकीकडे विद्यार्थी आंदोलन आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. आगामी बैठकीनंतर सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






