पुणे: कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आंदोलनादरम्यान झालेल्या घटनांबाबत केंद्र सरकार, पोलिस आणि भाजपवर विविध आरोप केले. तसेच विद्यार्थी, शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरही त्यांनी आपली भूमिका मांडली.

केंद्रीय शिक्षणमंत्रीपदावर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते अत्याचाराचं समर्थन करतात. या बदलामुळेही सरकारच्या कार्यपद्धतीत कोणताही सकारात्मक फरक पडलेला दिसत नाही. सत्ताधारी पक्षाकडे सक्षम पर्यायांची कमतरता असल्याची टीका करत, “त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला.

कॉकरोच जनता पार्टीला परदेशातून आर्थिक मदत मिळत असल्याचे आरोप होत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना दीपके म्हणाले की, जर असे खरोखर घडत असेल तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असलेल्या गृहमंत्र्यांचे ते अपयश ठरते. त्यामुळे या प्रकरणाचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी सांगितले.
भाजपकडून अनेकदा पक्षात येण्याची ऑफर मिळाल्याचा दावा करत, कोणत्याही परिस्थितीत आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काहीजणांकडून दबाव आणि धमक्या येत असल्याचाही आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी केंद्रीय शिक्षण व्यवस्थेवर आणि सरकारच्या धोरणांवरही टीका केली. देशात बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर होत असून, या विषयांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांबाबत बोलताना त्यांनी तरुणांना ट्रोल करण्याऐवजी त्यांचे प्रश्न समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. हीच तरुण पिढी भविष्यात देशाची जबाबदारी सांभाळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा आरोप करत त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचे दीपके म्हणाले. या घटनेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतकरी संघटनांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. आपण स्वतः शेतकरी कुटुंबातून आलो असून, गरज पडेल तेव्हा शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. पोलिसांच्या भूमिकेवर टीका करताना दीपके यांनी आंदोलनावेळी सर्वत्र कॅमेरे होते, त्यामुळे संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली. तसेच आंदोलनापूर्वी काही गोष्टींची पूर्वतयारी झाल्याचा दावा करत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणीही त्यांनी केली.








