पुणे: सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील नागरिकांसाठी काही महत्त्वाचे आर्थिक बदल लागू झाले आहेत. दैनंदिन वापरातील दूध, CNG आणि सार्वजनिक प्रवासाच्या खर्चात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय LPG, वाहनांच्या किमती आणि काही सरकारी सुविधांशी संबंधित नियमांमध्येही बदल झाले आहेत.

सैल म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात मोठी वाढ झाली आहे. 1 सप्टेंबरपासून दूध 93 रुपयांवरून 102 रुपये प्रति लिटर झाले आहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना यापेक्षा अधिक किंमत मोजावी लागू शकते. सणासुदीच्या काळात झालेल्या या दरवाढीमुळे घरखर्च वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईत रिक्षा णि टॅक्सीचे किमान भाडेही वाढले असून इतर ठिकाणीही वाढण्याची शक्यता आहे. रिक्षासाठी पहिल्या 1.5 किमीचे भाडे 26 रुपयांवरून 27 रुपये, तर काळी-पिवळी टॅक्सीचे किमान भाडे 31 रुपयांवरून 33 रुपये झाले आहे. नवीन दर मीटरमध्ये लागू करण्यासाठी चालकांना 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत सुधारित टॅरिफ कार्डच्या माध्यमातून भाडे आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

CNG आणि PNGच्या दरातही वाढ झाली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महागून 88 रुपये झाला आहे. घरगुती PNGच्या दरात प्रति SCM 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे CNG वाहनधारक आणि घरगुती गॅस ग्राहकांच्या खर्चात वाढ होऊ शकते.
याशिवाय काही वाहन कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमती वाढवल्या आहेत. काही प्रवासी सेवा आणि सरकारी सुविधांसाठी नवीन नियम लागू झाले आहेत. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून नागरिकांच्या दैनंदिन खर्चाशी संबंधित अनेक बदल पाहायला मिळत आहेत.






