मुंबई : उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच सरकारमध्ये अंतर्गत नाराजीची चर्चा रंगली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सरकार आणि मंत्र्यांवरील आक्रमक वक्तव्ये, तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली एक वर्षाची मुदतवाढ, या दोन मुद्द्यांवरून काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील सरकारच्या भूमिकेवर टीका करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील काही मंत्र्यांवरही त्यांनी आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना काही मंत्र्यांमध्ये असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा थेट आणि प्रभावी समन्वय राहावा, तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संवादाची प्रक्रिया अधिक स्पष्टपणे पुढे न्यावी, असा सूर काही मंत्र्यांकडून व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मुद्दा उद्याच्या बैठकीत चर्चेत येतो का, याकडे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरून शिवसेनेच्या काही मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याची माहिती आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी बदल केल्याने मराठी माणूस आणि भूमिपुत्रांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भावना काही मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे सरकारमधीलच काही घटक नाराज असल्याची चर्चा आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचा समन्वय आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी मुदतवाढीचा निर्णय, या दोन मुद्द्यांवर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही विषयांवर मंत्री आपली नाराजी व्यक्त करणार का आणि त्यावर सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






