Mulund Metro Slab Collapse : १४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजता मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने शहर सुन्न झाले. Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) कडून सुरू असलेल्या Mumbai Metro Line 4 च्या बांधकामादरम्यान उंचावरील पॅरापेटचा काँक्रीट भाग खाली कोसळला आणि तो थेट एका चालत्या ऑटो रिक्षावर आदळला. ही घटना एलबीएस रोडवरील अग्निशमन केंद्राजवळ, पियर क्रमांक P196 परिसरात घडली.

या दुर्घटनेत उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सरपंच रामधनी यादव यांचा जागीच मृत्यू झाला. ते मुंबईत मित्राला भेटण्यासाठी आणि नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी आले होते. त्यांच्या सोबत असलेले माजी सरपंच महेंद्र यादव आणि अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. फिरण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचा हा प्रवास अशा प्रकारे संपेल, याची कुणालाही कल्पना नव्हती.
MMRDAने घटनेनंतर तात्काळ मदतकार्य केल्याचे सांगत चौकशीची घोषणा केली आहे. मात्र या अपघाताने मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असलेल्या कामांदरम्यान खाली जाणाऱ्या वाहतुकीसाठी पुरेशी सुरक्षा का नव्हती? संरक्षक जाळी, बॅरिकेड्स आणि सेफ्टी ऑडिटची अंमलबजावणी कितपत काटेकोरपणे झाली?
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत विकासाच्या नावाखाली सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. “मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबईत वेगाने उभारल्या जाणाऱ्या पायाभूत प्रकल्पांसोबत सुरक्षा व्यवस्थाही तितकीच मजबूत असणे गरजेचे आहे. अन्यथा ‘विकास’ हा शब्द नागरिकांच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो.







