NCP Merger Update : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले होते. दोन्ही गट एकत्र येणार का, असा सवाल कार्यकर्त्यांपासून ते राजकीय वर्तुळात उपस्थित होत असतानाच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. (NCP Merger Update)

शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अजित पवार जिवंत असताना दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. मात्र सध्या हा विषय पूर्णपणे बंद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्हीच विलीनीकरणासाठी धडपड करतोय, असं चित्र निर्माण केलं जात आहे. पण आमच्याकडून कोणतीही हालचाल सुरू नाही,” असे ते म्हणाले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर या चर्चांना आणखी वेग मिळाला होता. दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत उत्सुकता वाढली होती. मात्र शिंदे यांच्या वक्तव्यानंतर सध्या तरी विलीनीकरणाची शक्यता धूसर झाल्याचे दिसते.
विलीनीकरणाला काही नेत्यांचा विरोध आहे का, या प्रश्नावर शिंदे यांनी नाव घेणे टाळले. त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येकाने आपली भूमिका स्वतः मांडावी. “आता आमचा भर स्वतंत्रपणे पक्ष उभारणीवर आहे,” असे ते म्हणाले.
विलीनीकरण झाल्यास National Democratic Alliance (NDA) सोबतचे समीकरण काय राहिले असते, यावरही त्यांनी सावध भूमिका घेतली. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर पुढील दिशा ठरवायची होती, असे त्यांनी सांगितले.
एकूणच, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील राजकीय अंतर कायम असल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक निवडणुका आणि सत्तासमीकरणे लक्षात घेता, महाराष्ट्रातील राजकारणात पुढील काही महिने निर्णायक ठरणार आहेत.







