पुणे: आगामी 1 मे महाराष्ट्र दिनापासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मोटार परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत परवानाधारक चालकांची तपासणी केली जाणार असून त्यांना मराठी वाचता आणि लिहिता येते का, याची पडताळणी होणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे. मात्र मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरांमध्ये अनेक चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. काही चालक प्रवाशांशी मराठीत बोलण्यास टाळाटाळ करत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर आता नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपासणीदरम्यान मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, ज्या राज्यात व्यवसाय करायचा आहे, त्या राज्याची भाषा शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मातृभाषेचा अभिमान जितका महत्त्वाचा आहे, तितकाच इतर राज्यांच्या भाषेचा आदर करणेही गरजेचे आहे. त्यामुळे सर्व चालकांनी मराठी भाषा आत्मसात करणे आवश्यक आहे.
दरम्यान, काही परप्रांतीय तसेच परदेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवून परवाने घेतल्याच्या तक्रारीनंतर हा मुद्दा समोर आला. या प्रकरणातही सखोल चौकशी केली जाणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.







