Maharashtra Politics: मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याबाबत शरद पवार गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला अजित पवार गटातील सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या विलीनीकरणाला विरोध दर्शवल्याचे समजते. या राजकीय पेचप्रसंगातच राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ अचानक संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ होण्याचे मुख्य कारण मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात उघडकीस आलेले लाचखोरीचे प्रकरण आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका मेडिकल स्टोअरचा निलंबित झालेला परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. अटकेनंतर या लिपिकाने असा खळबळजनक दावा केला की, त्याने ही रक्कम मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवाच्या सांगण्यावरून घेतली होती. या खुलाशामुळे थेट मंत्र्यांचे कार्यालय संशयाच्या घेऱ्यात आले असून विरोधक आता अधिक आक्रमक झाले आहेत.
या प्रकरणानंतर नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे शनिवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. नाशिकमध्ये आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार होते, परंतु त्यांच्या अनुपस्थितीमुळे आयोजकांची मोठी तारांबळ उडाली. विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर कडक शब्दांत टीका करत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनातच भ्रष्टाचार होत असेल तर हे सरकार कोणासाठी चालले आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे, नरहरी झिरवाळ यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी आपण मुंबईत नव्हतो, असे त्यांनी सांगितले आहे. जर या प्रकरणात आपला किंवा आपल्या कार्यालयाचा कोणताही दोष आढळला, तर नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण पदाचा राजीनामा देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आपली बाजू मांडण्यासाठी ते सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.






