मुंबई: ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबातील वाद अधिकच चिघळला असून, त्यांची सून गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषद घेत सासरच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. लग्नानंतर पतीने अनेक महिने शारीरिक संबंध ठेवले नाहीत आणि ही बाब लपवण्यासाठी आपल्याला अघोरी विधी व कथित उपचारांमध्ये अडकवण्यात आल्याचा दावा गिरीजा राऊत यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना गिरीजा राऊत म्हणाल्या, “डिसेंबर २०१७ मध्ये माझा आणि गितेश राऊत यांचा विवाह झाला. मात्र, त्यानंतर जवळपास नऊ महिने आमच्यात कोणतेही शारीरिक संबंध झाले नाहीत. या विषयावर दोन्ही कुटुंबांमध्ये चर्चाही झाली होती. मात्र, माझे पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याची वस्तुस्थिती लपवण्यात आली आणि त्याऐवजी माझ्यावर विविध अघोरी उपचार करण्यात आले.”

गिरीजा राऊत यांनी पुढे दावा केला की, सप्टेंबर २०१८ ते २०२२ या काळात त्यांना विविध कथित बाबा आणि मांत्रिकांकडे नेण्यात आले. “माझ्या अंगावरून जिवंत कोंबडा उतरवणे, कणकेच्या बाहुल्या आणि मांसाचे तुकडे वापरून उतारे करणे, न धुतलेले कपडे आणि केस वापरून विधी करणे, तसेच मला जबरदस्तीने अंगारा पाजणे असे प्रकार माझ्यासोबत घडले,” असा आरोप त्यांनी केला.

इतकी वर्षे तक्रार का केली नाही, या प्रश्नावर उत्तर देताना गिरीजा राऊत म्हणाल्या, “राऊत कुटुंबाला मोठे राजकीय पाठबळ होते. त्यामुळे मी तक्रार करण्याचे धाडस करू शकले नाही. कधीतरी परिस्थिती बदलेल आणि संसार सुरळीत होईल, या आशेवर मी सात वर्षे शारीरिक, मानसिक आणि भावनिक छळ सहन केला.”
तसेच, “मला हायपोथायरॉईडचा त्रास असतानाही मला बळजबरीने नैराश्यावरील औषधे घेण्यास भाग पाडण्यात आले,” असाही आरोप त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी विनायक राऊत, त्यांचा मुलगा गितेश राऊत, पत्नी शामल राऊत यांच्यासह कुटुंबातील सात जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधितांची बाजू आणि तपासाचे निष्कर्ष अद्याप समोर येणे बाकी आहे.







