मुंबई: मुंबई (BMC News) महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महापौरपदावरून सुरु असलेल्या हायव्होल्टेज राजकीय नाटकावर अखेर पडदा पडताना दिसत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असणार आणि मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार, या प्रश्नाचे उत्तर आता स्पष्ट झाले आहे. ‘ताज लँड्स एंड’ मध्ये सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना ठेवल्याचे हॉटेल पॉलिटिक्स अखेर यशस्वी ठरले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतही आपली ‘किंगमेकर’ची भूमिका सिद्ध केली आहे.

मुंबईत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तेचे गणित जुळवण्यासाठी त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकांची नितांत गरज होती. हीच संधी साधून एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने मोठेपणा दाखवत महापौरपद शिंदे गटाला देण्याचे मान्य केले आहे. मुंबईत ‘अडीच-अडीच वर्षे’ महापौरपदाचा फॉर्म्युला राबवला जाणार असून, पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा (शिंडे गट) महापौर बनणार आहे.
तिजोरीच्या चाव्या भाजपकडेच
राजकारणात काहीही मोफत मिळत नसते, तसेच येथेही झाले आहे. शिंदेंना ‘मानाचे’ महापौरपद दिले असले, तरी ‘स्थायी समिती सभापती’ पद भाजपने स्वतःकडे ठेवले आहे. याचा अर्थ असा की, मिरवण्यासाठी पद शिंदे गटाकडे असेल, मात्र विकासकामे आणि निधीच्या वाटपाचे अधिकार भाजपच्या हातात राहतील.







