Yavat News : यवत (पुणे) : दौंड तालुक्यातील खामगाव परिसरातील तांबेवाडी ते यवत स्टेशन या महत्त्वाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. तांबेवाडी हद्दीत रस्त्यावर सर्वत्र खडी पसरली असून, हा मार्ग दळणवळणासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अक्षरशः ‘तारेवरची कसरत’ करावी लागत असून, प्रशासनाच्या या दिरंगाईबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. Yavat News

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून खामगावमार्गे उत्तर भागात जाण्यासाठी हा सर्वात जवळचा आणि सोयीचा मार्ग आहे. खामगाव, दहिटणे, देवकरवाडी, मिरवडी आणि नांदूर या गावांतील नागरिक शासकीय कामे, बाजारपेठ आणि रेल्वे प्रवासासाठी याच रस्त्याचा वापर करतात. यवत स्टेशनवरून दररोज शेकडो नोकरदार, विद्यार्थी आणि शेतकरी पुणे शहराकडे ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकांना लांबचा वळसा घालून जावे लागत आहे. दुर्दैवाने, पर्यायी मार्गांची स्थितीही फारशी वेगळी नसल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे. Yavat News
रस्त्यावरील उखडलेली खडी दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. खडीवरून गाड्या घसरून लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. “रस्त्याची ही दुरवस्था आणखी किती दिवस सोसायची? संबंधित विभाग एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. Yavat News
दौंड पंचायत समितीची सत्ता नुकतीच भारतीय जनता पक्षाच्या हाती आली असून, या भागाचे प्रतिनिधित्व करणारे सुखदेव चोरमले यांची सभापतीपदी निवड झाली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तांबेवाडी-यवत स्टेशन रस्ता आणि खामगाव भागाला जोडणाऱ्या इतर रस्त्यांचे प्रश्न त्यांच्या माध्यमातून मार्गी लागतील, अशी मोठी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. Yavat News
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ रस्त्याचे काम हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. Yavat News







