पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून महाराष्ट्रात मोठे राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमासाठी पैसे देऊन मुलं आणल्याचा गंभीर आरोप केला आहे.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या कार्यक्रमासाठी सुमारे 3,000 लोकांसाठी प्रति व्यक्ती 30 ते 35 हजार रुपये खर्च केले जात असून एकूण 9 ते 10 कोटी रुपयांची उधळण केली जात असल्याचा दावा त्यांनी केला. या अफाट खर्चाचा स्रोत काँग्रेसने जाहीर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनाथ बन यांच्या आरोपांची गांभीर्याने दखल घेत त्यांची सखोल पडताळणी व चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले.

तसेच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दावा केला की, कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या 90 ते 95 टक्के मुली या केवळ काँग्रेस नेत्यांच्या मालकीच्या महाविद्यालयांतीलच आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स आणि विद्यार्थिनींना पैसे देऊन बोलावण्यात आले आहे. सोशल मीडियावर केवळ सकारात्मक मजकूर टाकण्याची अट घालण्यात आली असून, नकारात्मक पोस्ट केल्यास पैसे दिले जाणार नाहीत, अशी तंबी दिल्याचेही त्यांनी सांगितले. हा संपूर्ण प्रकार म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी प्रसिद्धीसाठी निर्माण केला जाणारा एक स्टंट किंवा इव्हेंट मॅनेजमेंटचा भाग आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

दरम्यान, कार्यक्रमाच्या काही तास आधी पुण्यात राजकीय तणाव प्रचंड वाढला. काल रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या राड्यानंतर पोलिसांनी कारवाई करत काहींवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, प्रशासन केवळ आमच्याच कार्यकर्त्यांना लक्ष्य करत असून हा दहशत पसरवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला आहे.







