पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच केली आहे. गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या अन्नत्याग उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांच्या बिघडत चाललेल्या आरोग्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. त्यांच्या पत्नीने सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास मराठा समाजाचा तळतळाट सरकारला लागेल, असा इशारा जरांगे यांच्या पत्नीने दिला आहे.

पुढे त्या म्हणाल्या, “एखादी व्यक्ती 18 तास अन्न- पाण्याशिवाय राहू शकत नाही, तिथे 18 दिवस उपोषण करूनही सरकारला दया येत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने आधीच योग्य तोडगा काढला असता, तर त्यांच्यावर मुंबईला जाण्याची वेळ आली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.त्यांच्या जीवाला काय झालं तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबांचा तळतळाट सरकारला लागेल असं जरांगे यांच्या पत्नीने म्हटलं आहे.

जरांगे यांच्या मुलीनेही आपली काळजी व्यक्त करत सरकारला कागदोपत्री आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. “वडिलांनी अनेक मागण्यांसाठी वारंवार लढा दिला आहे, पण सरकारने केवळ काहीच मागण्या मान्य केल्याचे भासवू नये. सर्व मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी,” अशी मागणी तिने केली आहे.वडिलांची तब्येत बिघडली असताना देखील अशा अत्यंत बिकट परिस्थितीत हजारो मराठा आंदोलकांसह ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले असून पुढील पाच दिवसांत ते मुंबईत पोहोचण्याचा अंदाज आहे.

सरकारने वेळेत मागण्या पूर्ण न केल्यानेच पुन्हा मुंबईत जाण्याची वेळ आल्याचा आरोप जरांगे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.त्यांची सर्व मागण्या केवळ कागदावर न ठेवता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्वरित व्हावी, हीच मुख्य मागणी आहे.







