Shivshahi Bus ठाणे : ठाणे स्टेशन परिसरात बोईसरकडे जाणाऱ्या एका शिवशाही बसला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठा अनर्थ टळला आहे. बसमध्ये एकूण 15 प्रवासी होते, जे वेळीच बाहेर पडल्याने सुखरूप वाचले आहेत. आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र, या आगीत एका महिला प्रवाशाचे 3 तोळे सोने बॅगसह अडकले होते, जे अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर सुरक्षित बाहेर काढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून वापीला जाणारी एक शिवशाही बस ठाण्याहून बोईसरकडे निघाली होती. प्रवासाला सुरुवात होताच, ठाणे स्टेशनजवळ बसच्या इंजिन आणि डिझेल टाकीच्या भागातून धूर निघू लागला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. बस चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि सर्व 15 प्रवाशांना तातडीने बाहेर काढले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र, धावपळीत एका महिला प्रवाशाची बॅग बसमध्येच राहिली, ज्यामध्ये तिचे 3 तोळे सोने होते.
आग इतकी भीषण होती की, काही मिनिटांतच संपूर्ण बस जळून कोळसा झाली. महिला प्रवाशाला आपले सोने जळाल्याची भीती वाटत होती आणि तिचा जीव टांगणीला लागला होता. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आग विझल्यानंतर, जवानांनी जळाल्या बसमध्ये आणि राखेच्या ढिगाऱ्यात सोने शोधण्याचे काम सुरू केले. आश्चर्यकारक बाब म्हणजे, बस पूर्णपणे जळून खाक झाली असली तरी, जवानांना त्या महिलेचे दागिने वितळण्यापासून वाचले आणि सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
दरम्यान, जळाल्या बसमधून सोने सुरक्षित बाहेर काढल्यामुळे महिला प्रवाशाने सुटकेचा नि:श्वास टाकला आणि अग्निशमन दलाच्या जवानांचे मनापासून आभार मानले. या घटनेमुळे ठाणे स्टेशन परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.





