Msedcl News लोणी काळभोर, ता. ६ : अवकाळी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता पावसापेक्षा महावितरणच्या विजेचीच अधिक भीती वाटू लागली आहे. पूर्व हवेली परिसरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, रखडलेली देखभाल कामे आणि निष्क्रिय प्रशासनामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. “महावितरणचा निष्काळजीपणा आता नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहे. Msedcl News
लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, थेऊर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह २० हून अधिक गावांमध्ये दिवसातून अनेकदा वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी नवीन उपकेंद्रांचा अभाव, तर काही भागांत जुनाट यंत्रणा आणि ओव्हरलोडमुळे सतत ट्रिपिंग होत आहे. परिणामी घरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना उकाड्यात अक्षरशः जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहेत. Msedcl News
पावसाळ्यापूर्वी आवश्यक असलेली झाडांची छाटणी, झोळ काढणे, केबल दुरुस्ती आणि इतर देखभाल कामे अद्यापही पूर्ण न झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “पहिला पाऊस पडला की तासन्तास वीज गायब होणार, हे आता ठरलेलंच आहे,” अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली. Msedcl News
महावितरणच्या या ढिसाळ कारभाराचा फटका केवळ घरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बँका, पोलीस ठाणे, पोस्ट कार्यालये, नागरी सुविधा केंद्रे तसेच शासकीय आणि खासगी कार्यालयांमधील कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. ऑनलाईन सेवा ठप्प होत असून नागरिकांना तासन्तास हेलपाटे मारावे लागत आहेत. Msedcl News
रात्री उकाडा आणि मच्छरांच्या त्रासामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून केवळ “फुरसुंगी लाईनमध्ये तांत्रिक बिघाड” असेच ठरलेले उत्तर दिले जात असल्याने संताप अधिक वाढला आहे. “वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण नेमके काय करत आहे?” असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.






