मुंबई: राज्यातील निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदांआधी महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रपूर आणि नागपूर या दोनच मनपात आरक्षणाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे, उर्वरित 27 महापालिकांच्या निवडणुका आधी घेणे निवडणूक आयोगाला सोयीस्कर वाटत आहे.

राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुका घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आयोगाकडून आगामी निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम लवकरच घोषित केला जाऊ शकतो.
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्राथमिक विचार राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. कारण दोन्ही निवडणुकांसाठीचे मतदारसंघ वेगळे असल्याने व्यवस्थापन करणे सोयीचे ठरू शकते. असा आयोगाचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची महत्त्वाची बैठक आज 4 नोव्हेंबर रोजी बोलावली आहे. या बैठकीमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकाच्या तयारीचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. ज्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. आता राज्यातील नागरिकांचे आणि सर्व राजकीय पक्षांचे लक्ष आयोगाच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.







