विशाल शिंदे

पुणे : नसरापूर–वेल्हे मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा गंभीर बनली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील खड्डे भरल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले होते. त्यामुळे पहिल्याच पावसात अनेक ठिकाणचे खड्डे पुन्हा उखडून रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.

यापूर्वीही या विषयावर वारंवार बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. रस्त्यावरील वाढत्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका वाढल्याची बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतर काही काळ पावसाने उघडीप दिली होती. तो कालावधी रस्त्यांची योग्य दुरुस्ती करण्यासाठी अनुकूल असतानाही विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या मते, खड्डे भरताना त्यामधील चिखल, माती व सैल खडी न काढता थेट डांबर टाकण्यात आले. त्यावर मोठे दगड व खडी टाकून काम पूर्ण केल्याचे दाखवण्यात आले. या निकृष्ट कामाबाबत काही ठिकाणी नागरिकांनी कामही रोखले होते आणि दर्जेदार दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र, त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले नाही.
सध्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस व जोरदार वारे सुरू असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या आणि खोली दोन्ही वाढल्या आहेत. नसरापूर परिसरात अनेक ठिकाणी गुडघाभर खड्डे पडले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, या खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, पावसाचा जोर आता काही प्रमाणात कमी होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात तरी खड्डे तातडीने भरावेत. अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील.
नसरापूर–वेल्हे मार्ग हा अनेक गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून, दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापारी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दर्जेदार दुरुस्ती करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.







