पुणे : पश्चिम आशियातील सतत वाढता तणाव आणि राजकीय अनिश्चिततेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचे दर कमालीचे वाढले आहेत. त्यातच इंधनाच्या दरात होणारी वाढ, वाहतूक खर्चाचा अतिरिक्त भार आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यांमुळे भारतीय उत्पादकांवर मोठा ताण पडत आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम आता ग्राहकांच्या खिशावर होणार असून, येत्या ऑगस्ट महिन्यापासून अनेक नित्योपयोगी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या वस्तू महागणार?

ऑगस्ट महिन्यापासून दैनंदिन वापरातील चहा, हेअर ऑइल, रेडीमेड कपडे यांसारख्या वस्तूंबरोबरच रेफ्रीजरेटर, टेलिव्हिजन आणि चारचाकी गाड्यांच्या (पॅसेंजर वाहने) दरात 6 ते 8 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र: या वर्षात रेफ्रीजरेटर आणि वॉशिंग मशीनचे दर आधीच 10 टक्क्यांनी वाढले आहेत, तर टीव्ही 15 टक्क्यांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. मेमरी चिप्सचा तुटवडा आणि वाढलेल्या खर्चामुळे स्मार्टफोन निर्मितीचा खर्चही वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या ऑगस्टपासून आणखी 4 ते 6 टक्क्यांनी दर वाढवण्याच्या तयारीत आहेत.
कपडे व फॅशन ब्रँड्स: अरविंद फॅशन्ससारख्या मोठ्या कंपन्यांनी नफा टिकवून ठेवण्यासाठी दरात बदल करण्याचे संकेत दिले आहेत. आतापर्यंत जुन्या आणि स्वस्त स्टॉकच्या बळावर कंपन्यांनी भाववाढ रोखली होती, मात्र नवीन व महागडा माल बाजारात दाखल झाल्याने किंमती वाढवणे अनिवार्य ठरले आहे.
ऑगस्टमध्ये केरळमधील ‘ओणम’ सणापासून भारतात मोठ्या फेस्टिव्ह सीझनची सुरुवात होते, जी गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीपर्यंत म्हणजेच पार नोव्हेंबर महिन्यापर्यंत चालते. या सणांच्या काळात मागणीवर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी कंपन्या ऑगस्टच्या सुरुवातीलाच ही भाववाढ करण्याच्या तयारीत आहे. याचा अधिक फटका सर्वसामांन्यांना बसणार आहे.






