IndiGo : देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात सध्या एकाधिकारशाही गाजवणाऱ्या मोठ्या कंपन्यांना आता जोरदार टक्कर मिळणार आहे. इंडिगोसारख्या बड्या विमान कंपनीच्या फ्लाईट्स अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर, प्रवाशांना प्रवासाचे अधिक सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना भारतात सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास आणि चांगल्या सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (IndiGo)

दोन कंपन्यांना ‘NOC’ जारी; तिसरीही तयारीत
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात ‘अल हिंद एअर’ आणि ‘फ्लायएक्सप्रेस’ या दोन कंपन्यांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) देण्यात आले आहे. यासोबतच ‘शंख एअर’ ही कंपनीदेखील लवकरच आपली उड्डाणे सुरू करणार आहे. सध्या विमान वाहतूक बाजारात इंडिगोचा वाटा तब्बल ६५ टक्के असून, एअर इंडियासोबत त्यांचे वर्चस्व आहे. मात्र, आता नव्या कंपन्यांच्या प्रवेशामुळे प्रवाशांना केवळ एकाच कंपनीवर अवलंबून राहावे लागणार नाही.
स्पर्धा वाढल्याने सर्वसामान्यांना होणार फायदा
जेव्हा बाजारात स्पर्धा कमी असते, तेव्हा विमान कंपन्यांकडून तिकीट दर वाढवले जातात. आता नवीन कंपन्यांमुळे बाजारात निरोगी स्पर्धा निर्माण होईल. तज्ज्ञांच्या मते, यामुळे विमानाची तिकिटे स्वस्त होऊ शकतात आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जाही सुधारेल. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत किमान ५ मोठ्या विमान कंपन्या असणे गरजेचे आहे, त्यादृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे.
खर्चाचे गणित आणि पुढील आव्हाने
विमान कंपनी सुरू करणे सोपे असले तरी ती टिकवणे हे मोठे आव्हान असते. जेट इंधनाचे चढे दर आणि करांचा बोजा यामुळे कंपन्यांचा ऑपरेटिंग खर्च वाढतो. त्यामुळे सरकारने या तांत्रिक आणि आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. ‘उडान’ योजनेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सुधारली असली, तरी या नवीन कंपन्यांमुळे मोठ्या शहरांमधील प्रवास अधिक सुखकर आणि परवडणारा होणार आहे.







