न्हावरे : पारोडी(ता.शिरूर)येथील गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट या कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने २६ जून रोजी धडक कारवाई केली.त्यानंतर तब्बल १२ हजार लिटर संशयास्पद भेसळ युक्त दूध नष्ट केले.डेअरीला सील ठोकले आणि परवाना निलंबित केल्याची माहिती दिली.या कारवाईची राज्यभर चर्चा झाली.मात्र,या कारवाईला आता सुमारे पंधरा दिवस उलटूनही संबंधित जबाबदार व्यक्तींवर नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करण्यात आली.याचा खुलासा अन्न व औषध प्रशासनाने केलेला नाही.त्यामुळे या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

कारवाईवेळी दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता,दूध नमुन्यांचा तपासणी अहवाल येण्यासाठी साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागतो.अंतिम अहवाल आल्यानंतरच संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र,नागरिकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की,जेव्हा अंतिम अहवाल अद्याप आलेलाच नाही.तेव्हा मोठ्या कारवाईचा गाजावाजा करण्यात आला;पण त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती का देण्यात आली नाही? यामुळे ही कारवाई केवळ प्रसिद्धीपुरती होती का,असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे,शिरूर तालुक्यात दूध संकलन केंद्रे,डेअऱ्या,बेकऱ्या तसेच दुधावर प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करणारे अनेक उद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत.मात्र,अशा इतर आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने अलीकडच्या काळात किती तपासण्या केल्या.किती नमुने घेतले आणि किती कारवाया केल्या, याबाबत कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही.त्यामुळे कारवाईची व्याप्ती केवळ एका कंपनीपुरतीच मर्यादित का राहिली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
माहितीनुसार,गगनगिरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट कंपनीकडे दररोज सुमारे १० हजार लिटर दूध संकलन होत होते.कंपनीकडून प्रामुख्याने मुंबईसह विविध ठिकाणी दूध पुरवठा केला जात होता.अशा परिस्थितीत, जर प्रत्यक्षात दुधामध्ये भेसळ आढळली असेल,तर हा प्रकार केवळ एका डेअरीपुरता मर्यादित आहे की, त्यामागे मोठे जाळे कार्यरत आहे. याचाही सखोल तपास होणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त होत आहे.
दुसरीकडे,जर प्रयोगशाळेच्या अंतिम अहवालात दूध सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.तर तेही तितक्याच पारदर्शकपणे जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे.त्यामुळे अंतिम सत्य काय आहे.भेसळ होती की नव्हती, दोषी कोण आणि पुढे काय कारवाई होणार,याबाबत अन्न व औषध प्रशासनाने अधिकृत भूमिका जाहीर करावी.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सध्या या प्रकरणात सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले असून,त्यानंतर प्रशासन नेमकी कोणती कायदेशीर कारवाई करते यावरच या संपूर्ण कारवाईची विश्वासार्हता अवलंबून राहणार आहे.







