पुणे : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणी अखेर पूर्ण झाली आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती भोसले यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आगामी निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, सध्या कोणत्याही अंतिम निष्कर्षावर पोहोचण्याचा किंवा हत्या अथवा लैंगिक अत्याचार झाला होता असे ठरवण्याचा न्यायालयाचा हेतू नाही. या प्रकरणात खरोखरच काही संशयास्पद बाबी आहेत का, हे तपासणे हाच न्यायालयाचा मुख्य उद्देश आहे.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी जानेवारी 2024 मध्ये दिलेल्या जबाबात, आर्थिक अडचणींमुळे तिने आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला होता. दिशाची आई वासंती सालियन यांनीही अशाच प्रकारची माहिती दिली. तसेच, तिचा प्रियकर रोहन राय याने दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादानंतर दिशा त्याच्याकडे आली होती आणि तणावाखाली दारूचे सेवन केल्यानंतर तिने हे पाऊल उचलले.

तसेच वैद्यकीय तपासणी अहवालात लैंगिक अत्याचाराच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. उंचावरून तोंडावर पडल्यामुळे तिची कवटी आणि जबड्याला गंभीर दुखापत झाल्याचे वकिलांनी सांगितले.तसेच रुग्णालयातील छायाचित्रांमध्ये मृतदेहावर कपडे असल्याचे दिसून आले, तर हॉस्पिटलच्या पंचनाम्यातील नोंदीबाबत न्यायालयात सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले.
दुसऱ्या बाजूने, आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पासबोला यांनी या याचिकेच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी रशीद खान पठाण यांनीही अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती आणि त्यावेळी दिशाच्या वडिलांनी कोणतीही अधिकृत तक्रार केली नव्हती, असा दावा त्यांनी न्यायालयात केला.
सर्व युक्तिवाद पूर्ण झाले असून, आता हायकोर्ट यावर काय निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






