मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुंबई व पुणे परिसरातील मुसळधार पावसामुळे पुणे- मुंबईदरम्यान धावणाऱ्या ‘ई-शिवनेरी’ला फटका बसला आहे. प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नात घट झाली असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पुण्यातून स्वारगेट आणि पुणे स्टेशन या दोन बसस्थानकांतून मुंबई मार्गावर ४८ ई-शिवनेरी धावतात. मुंबईवरून पुण्याला ४८ ई-शिवनेरी धावतात. या मार्गांवर दोन्ही बाजूने दिवसभरात १९२ फेऱ्या होतात; परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून घाट परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. पावसामुळे प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याने उत्पन्नात निम्म्याने घट झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात झालेल्या पावसाचा सिंहगड, डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना मंगळवारीही फटका बसला. मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या इंद्रायणी, इंटरसिटी या दोन्ही गाड्यांना उशीर झाला. शहरासह राज्याच्या अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाहतुकीसह रेल्वेसेवेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.







