नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली सोमवारी (Delhi Blast) सायंकाळी झालेल्या भीषण (Delhi News) स्फोटाने अक्षरशः हादरून गेली. लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये सायंकाळी 6.52 वाजता मोठा स्फोट झाला. काही क्षणांतच परिसरात धुरांचे लोट पसरले, आग चारही बाजूनं पसरली आणि गाड्या पेटल्या, लोकांनी बचावासाठी जीवाच्या आकांताने घटनास्थळावरून पळ काढला. या भीषण घटनेमध्ये आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत.

घटनेनंतर पोलिस, अग्निशमन दल आणि एनएसजीच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटामुळे आसपासच्या 8 ते 10 गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या. अग्निशमन दलाला सायंकाळी 6.55 वाजता अलर्ट मिळताच त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. “स्फोट इतका जबरदस्त होता की, जवळच्या दुकानांच्या काचाही फुटल्या,” असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
फॉरेन्सिक तज्ञांनी स्फोटाच्या ठिकाणावरून गाडीचे तुकडे आणि इतर पुरावे जप्त केले आहेत. प्राथमिक तपासात घटनास्थळी कुठलेही शार्पनेल, छर्रे किंवा खिळे आढळले नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे एवढ्या लोकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा प्रश्न तपासकर्त्यांपुढे निर्माण झाला आहे.
दरम्यान, तपासात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी फरीदाबाद–सहारनपूर मॉड्यूलचा पर्दाफाश करत डॉक्टर आदिल अहमद राथर आणि डॉक्टर मुझम्मिल गनई या दोन संशयितांना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 2900 किलो स्फोटकं आणि मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
“ही केवळ एक घटना नाही, तर भारताविरोधात छेडलेलं युद्ध आहे. नागरिकांनी सतर्क राहून कान आणि डोळे उघडे ठेवणं अत्यंत आवश्यक आहे,” असं संरक्षण विश्लेषक निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी सांगितलं. त्यांनी हा स्फोट मे 2025 मधील ‘ऑपरेशन सिंदूर’ला प्रत्युत्तर म्हणून झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
सध्या लाल किल्ला, चांदणी चौक आणि आसपासचा परिसर पोलिसांनी सील केला आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता अशा प्रमुख शहरांत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्र आणि गृहमंत्रालयाच्या पथकांनी दिल्ली पोलिसांकडून प्राथमिक अहवाल मागवला असून तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवला जाण्याची शक्यता आहे. या घटनेने पुन्हा एकदा दिल्लीच्या सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.






