Cyber Crime : उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बरेली शहरात एका 13 वर्षीय मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्याचे कुटुंब सायबर फसवणुकीपासून थोडक्यात वाचले आहे. 8वीत शिकणाऱ्या तन्मय सक्सेना याने सायबर भामट्यांचा ‘डिजिटल अरेस्ट’चा डाव ओळखून आपल्या पालकांची मोठी आर्थिक फसवणूक होण्यापासून रोखली. आरोपींनी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणजेच एनआयएचे अधिकारी असल्याचे भासवून तन्मयच्या वडिलांना फोन केला होता. तुमच्या फोन नंबरचा वापर दहशतवादी कारवाया आणि 300 कोटी रुपयांच्या घोटाळ्यासाठी झाला आहे, असे सांगून भामट्यांनी पालकांना भीती घातली होती.
तन्मयचे वडील संजय सक्सेना हे बेकरी व्यावसायिक आहेत. आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरच थांबवून ठेवले होते. इतकेच नाही तर त्यांना व्हॉट्सॲपवर एक बनावट अटक वॉरंट देखील पाठवले होते. यामुळे घाबरलेल्या पालकांनी आपल्या बँकेचे सर्व तपशील, घरातील दागिने आणि मालमत्तेची माहिती भामट्यांना दिली होती. मात्र, तन्मयने काही दिवसांपूर्वीच वर्तमानपत्रात डिजिटल अरेस्ट आणि सायबर फसवणुकीच्या बातम्या वाचल्या होत्या. जेव्हा समोरच्या व्यक्तीने घरातील मौल्यवान वस्तूंची चौकशी सुरू केली, तेव्हा तन्मयला हा प्रकार फसवणुकीचा असल्याची खात्री पटली.
तन्मयने आपल्या आई-वडिलांना हा फोन कापण्यासाठी वारंवार विनंती केली, पण भीतीमुळे ते ऐकत नव्हते. अखेर तन्मयने एक युक्ती लढवली. त्याने वडिलांना सांगितले की, तुम्ही काही वेळ विश्रांती घेण्यासाठी फोन फक्त ‘फ्लाइट मोड’वर टाका, जेणेकरून कॉल कट होणार नाही. वडिलांनी त्याचे ऐकले आणि जसा फोन फ्लाइट मोडवर गेला, तसा कॉल कट झाला. यानंतर तन्मयने तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सुरक्षिततेसाठी सक्सेना यांची बँक खाती काही काळासाठी गोठवली आहेत. बरेलीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तन्मयच्या या जागरूकतेचे मोठे कौतुक केले आहे. वर्तमानपत्रातील माहितीमुळे एका कुटुंबाची मोठी लूट टळली आहे.







