Crime : दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीच्या छेडछाडीच्या घटनेने वैजापुर तालुक्यातील खंडाला येथे मोठी खळबळ उडाली आहे. बहिणीची छेड काढणाऱ्यांना जाब विचारल्याच्या रागातून टवाळखोरांनी विद्यार्थिनीच्या भावावर थेट परीक्षा केंद्राजवळ जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनी दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी बाहेरगावाहून खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या परीक्षा केंद्रावर येत होती. मात्र गेल्या 3 दिवसांपासून काही स्थानिक तरुण तिचा पाठलाग करत छेडछाड करत होते. सततच्या त्रासामुळे विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या भावाला सांगितला.
घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे 10 वाजता तिचा भाऊ तिला परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आला. त्यावेळी त्याने संबंधित तरुणांना जाब विचारला. त्यानंतर विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी वर्गात गेली; मात्र काही वेळातच बाहेर दबा धरून बसलेल्या टवाळखोरांनी तिच्या भावाला घेरले. अचानक झालेल्या या हल्ल्यात आरोपींनी खिशातून फायटर (धारदार हत्यार) काढून तरुणाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेला तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी तत्काळ धाव घेत हस्तक्षेप केल्याने मोठी अनर्थ टळला. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या परीक्षा केंद्रावर यापूर्वीही तणावाचे वातावरण होते. 2 दिवसांपूर्वी काही टवाळखोरांनी केंद्रावर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना धमकावल्याची घटना घडली होती. इतक्या गंभीर प्रकारानंतरही पुरेशी पोलीस बंदोबस्त व्यवस्था नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हल्ल्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे 3 संशयितांना ताब्यात घेतले असून या हल्ल्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून होत आहे.







