Crime News: छत्रपती संभाजीनगर : बकवालनगर येथील हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमोल एकनाथ बारे (वय 30) यांच्या हत्येमागे घटस्फोटाचा वाद कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात एका अल्पवयीनासह चार जणांचा सहभाग असल्याचे उघड झाले असून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तब्बल 1800 किलोमीटरचा पाठलाग करून जालना येथून आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बारे यांना पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्यांना घटस्फोट घ्यायचा होता. अमोलची पत्नी आणि युवराजची पत्नी या चुलत बहिणी असल्याने, युवराज व त्याच्या पत्नीने अमोलच्या पत्नीला घटस्फोटासाठी राजी करावे, असा दबाव अमोल टाकत होता. मात्र अमोलच्या पत्नीने घटस्फोटास नकार दिल्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद वाढत गेला.
या वादाला 4 जानेवारी रोजी गंभीर वळण मिळाले. त्या दिवशी रात्री अमोलने युवराजला फोन करून शिवीगाळ केली तसेच धमकी दिली. या प्रकारामुळे युवराज संतप्त झाला. त्यानंतर त्याने प्रमोद वाकचौरे आणि शुभम राठोड यांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून अमोलला दुचाकीवर बसवले आणि ओअॅसिस चौक परिसरात नेले.
तेथे अमोलला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीदरम्यान प्रमोद वाकचौरे याने धारदार चाकूने अमोलच्या छातीवर, गळ्यावर आणि पाठीत वार केले. गंभीर जखमांमुळे अमोल रक्तबंबाळ झाला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलिसांनी विविध ठिकाणी शोध घेत तब्बल 1800 किलोमीटरचा प्रवास करून जालना येथे आरोपींना अटक केली. या प्रकरणात एका अल्पवयीनाचा सहभाग असल्याने त्याच्याविरोधात स्वतंत्र कारवाई करण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादातून हत्या झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करत आहेत.







