पुणे: गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड खटल्याचा अंतिम निकाल आज, २० जून २०२६ रोजी न्यायालयाने दिला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खटल्यात १२७ पेक्षा जास्त साक्षीदार तपासले गेले, परंतु सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यास अपयशी ठरला.

न्यायालयाने आपल्या निकालात तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर अत्यंत कडक ताशेरे ओढले. या खटल्याचा मुख्य पाया मानल्या जाणाऱ्या माफीच्या साक्षीदाराच्या (पारसमल जैन) साक्षीवर न्यायालयाने गंभीर शंका उपस्थित केली. या साक्षीदाराने अनेकदा आपली विधाने बदलली होती. शिवाय, त्याने आरोपींशी केलेल्या भेटी, शस्त्रे खरेदी आणि आर्थिक देवाणघेवाण याबद्दल दिलेली माहिती पुराव्यांच्या कसोटीवर उतरली नाही. तपास यंत्रणेने आरोपींचे मोबाईल रेकॉर्ड किंवा त्यांच्या प्रवासाचा कोणताही विश्वासार्ह पुरावा सादर केला नाही. धक्कादायक म्हणजे, आरोपींना अटक करताना त्यांच्याजवळ काय होते याची साधी नोंदही पोलिसांनी केली नव्हती.

न्यायालयाने हेही नमूद केले की, माफीच्या साक्षीदाराचा जबाब घेताना त्यावर न्यायाधीशांची स्वाक्षरी नव्हती. साक्षीदाराला मारहाण करून जबरदस्तीने कबुली मिळवल्याचा आरोपही त्याने केला होता. एका लोकनेत्याची हत्या होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, परंतु कायद्यानुसार केवळ संशयावर कोणालाही शिक्षा देता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निकालामुळे पीडित कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत, या प्रकरणाचा संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.






