लोणी काळभोर, ता. २० : काळाच्या ओघात आयुष्याची दिशा बदलली, अनेकांनी विविध क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली, केस पांढरे झाले, चेहऱ्यांवर अनुभवांच्या रेषा उमटल्या; मात्र शालेय जीवनातील मैत्रीची ऊब आणि जुन्या आठवणींची गोडी आजही तितकीच ताजी असल्याचा प्रत्यय थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात आला. तब्बल ३५ वर्षांनंतर १९९०-९१ च्या दहावीच्या बॅचमधील विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शाळेत एकत्र आले आणि काही तासांसाठी संपूर्ण परिसर जणू तीन दशकांपूर्वीच्या काळात परत गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.

एकेकाळी एकाच बाकावर बसून शिक्षण घेतलेले मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनंतर समोर आल्यानंतर सुरुवातीला काही जण एकमेकांना ओळखू शकत नव्हते. मात्र, नाव ऐकताच आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळताच सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. अनेकांनी एकमेकांना मिठी मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शाळेच्या आवारात पुन्हा एकदा शाळकरी मुलांसारखा उत्साह आणि चैतन्य अनुभवायला मिळाले.

काही वर्षांपूर्वी काही माजी विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. हळूहळू सर्वजण या समूहात सहभागी झाले आणि अखेर बहुप्रतीक्षित स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. ठरल्याप्रमाणे सकाळी दहा वाजता सर्व माजी विद्यार्थी चिंतामणी विद्या मंदिरात एकत्र आले आणि आठवणींच्या प्रवासाला सुरुवात झाली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजाराम काकडे यांच्यासह शिक्षक सुरेश महारनवर, शर्फुद्दीन सय्यद, सयाजीराव अहिरे, मुल्ला मॅडम, वनारसे मॅडम, सोकटे सर, बांगर सर, गायकवाड सर आणि शेलार सर उपस्थित होते. आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र पाहून शिक्षकांनाही विशेष आनंद झाल्याचे दिसून आले.
या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले ते सुरेश महारनवर सर. प्रवेशद्वाराजवळ हातात छडी घेऊन उभे राहिलेल्या महारनवर सरांनी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी मिळणाऱ्या “प्रसादाची” आठवण विनोदी शैलीत करून दिली. त्यामुळे एकच हशा पिकला आणि सर्वजण पुन्हा एकदा शालेय जीवनात रममाण झाले. या स्नेहमेळाव्यात ५५ हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सर्वांनी आपला परिचय करून देत शालेय जीवनातील गंमती-जमती, शिक्षकांचा दरारा, वार्षिक स्नेहसंमेलने, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, वर्गातील खोड्या, शिक्षा आणि अभ्यासाच्या आठवणींना उजाळा दिला. गप्पांच्या ओघात वेळ कसा निघून गेला, हे कोणालाच कळले नाही.
या कार्यक्रमाची सुरुवात विलास गव्हाणे आणि शिक्षिका करुणा कंद यांच्या कविता व गीतांनी झाली. त्यांच्या सादरीकरणामुळे वातावरण अधिक भावूक आणि उत्साहपूर्ण बनले. यावेळी माजी विद्यार्थिनी संगीता कांबळे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी झालेल्या पदोन्नतीबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर चंद यांची कन्या गायत्री हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल तिचेही अभिनंदन करण्यात आले. या स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मोहम्मद पठाण, विठ्ठल गावडे, आशिष कुरुलकर, राजू पाटील, बापू कांबळे, बाळासाहेब मदने, राजेश कुंजीर, अशोक गायकवाड, संगीता कांबळे आणि सुनंदा वढणे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हस्कु काळभोर यांनी सर्व सवंगड्यांना त्यांच्या व्यायामशाळेत नेऊन त्यांचा सन्मान केला.
दरम्यान, आज या बॅचमधील अनेक विद्यार्थी शेती, नोकरी, राजकारण, शिक्षण, पोलीस प्रशासन, उद्योग, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. “आमच्या आयुष्यातील यशामागे शाळेने दिलेले संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हेच खरे भांडवल आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
स्नेहभोजन आणि सामूहिक छायाचित्रणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. मात्र, निरोप घेताना अनेकांचे डोळे पाणावले. “पुढील वर्षी पुन्हा भेटू,” असा निर्धार करत सर्वजण आनंदाच्या असंख्य आठवणी मनात साठवून आपल्या घरी रवाना झाले. तब्बल ३५ वर्षांनंतर झालेल्या या पुनर्भेटीने मैत्रीचे बंध काळाच्या पलीकडेही तितकेच घट्ट राहतात, याची प्रचिती सर्वांनाच दिली.








