पुणे : मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांतून (ओबीसी) आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा तीव्र पाऊल उचलले आहे. अंतरवाली सराटी येथे त्यांच्या उपोषणाचा आज रविवारी दुसरा दिवस पूर्ण झाला आहे. जरांगे पाटील यांनी या आंदोलनातून ‘जात पडताळणी समिती’ पूर्णपणे रद्द करण्याची नवी आणि महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. या मागणीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आंदोलनस्थळी शासनाचे प्रतिनिधी हजर असून आंदोलकांशी सातत्याने संवाद साधला जात आहे. यापूर्वीसुद्धा आम्ही अत्यंत संवेदनशीलतेने अनेक जटिल प्रश्नांतून मार्ग काढला आहे आणि पुढेही मार्ग काढू. उपमुख्यमंत्री शिंदे हे सुरुवातीपासूनच या संपूर्ण विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे काम करत आहेत.असे त्यांनी सांगितले.

तसेच जात पडताळणी समिती रद्द करण्याच्या मागणीबाबत स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या, कायदेशीरदृष्ट्या वैध असणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन न करणाऱ्या प्रत्येक मागणीवर सरकार सकारात्मक आहे. अशा सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी प्रशासनाचे आणि सरकारचे दरवाजे कायम उघडे आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूला, परभणी येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित कार्यक्रमाला जरांगे पाटील यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. अंतरवाली सराटीतून जरांगे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरांगे यांच्या मागण्यांवर लवकरच योग्य तो मार्ग शोधला जाईल, असे फडणवीस यांनी आश्वस्त केले.






