वाशिम : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील गोकसावंगी येथील 24 वर्षीय तरुण आणि 21 वर्षांची तरुणी 14ऑगस्टपासून अचानक बेपत्ता झाले होते. नातेवाईकांनी मालेगाव पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, बुधवारी गावाजवळील मोर्णा तलावात मासेमारीसाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना या दोघांचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आले. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या दोघाचही एकमेकांवर मनापासून प्रेम करत होते आणि त्यांना विवाहबंधनात अडकायचे होते. त्यांनी आपल्या कुटुंबाकडे लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, दोघेही वेगवेगळ्या जातींचे असल्याने दोन्ही बाजूंच्या पालकांचा या आंतरजातीय विवाहाला तीव्र विरोध होता. मुलांनी कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पालक आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने दोघेही प्रचंड नैराश्यात गेले होते.

घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्याने आणि समाजात एकत्र जगणे कठीण वाटू लागल्याने त्यांनी अखेर स्वतःचे जीवन संपवण्याचा मार्ग निवडला. 14 ऑगस्ट रोजी ते मोर्णा तलावाच्या परिसरात आले आणि त्यांनी पाण्यात उडी घेतली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मालेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत असून, कुटुंबियांची व प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली जात आहे. आजच्या आधुनिक काळातही आंतरजातीय प्रेमाला मिळणाऱ्या विरोधामुळे दोन तरुण जिवांना आपला प्राण गमवावा लागल्याने समाजातील या खोट्या प्रतिष्ठेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.






