BMC New Mayor : राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता हस्तगत केली आहे. निकालानुसार भाजपने ८८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला असून शिवसेनेला २८ जागा मिळाल्या आहेत. यामुळे महायुतीचा एकूण आकडा निर्णायक ठरला आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ६७ तर राज ठाकरे यांच्या मनसेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला २४ जागा मिळाल्या असून इतर आणि अपक्ष मिळून १० नगरसेवक निवडून आले आहेत.

या निवडणुकीची पार्श्वभूमी महत्त्वाची आहे. तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर वर्चस्व असलेल्या ठाकरे गटाला यावेळी सत्तेबाहेर ढकलण्यात महायुती यशस्वी ठरली. उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत युती केली होती. मात्र अपेक्षेप्रमाणे मतांचे एकत्रीकरण झाले नाही. मतदारांनी स्थैर्य, विकास आणि सत्तेतील स्पष्ट बहुमताला पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट होते.
या विजयामुळे आता मुंबईला ‘हिंदू मराठी’ महापौर मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र महापौरपदाची निवड लगेच होणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथील गुंतवणूक परिषदेसाठी रवाना होत असून ते २५ जानेवारीला परतणार आहेत. त्यामुळे महापौर निवड प्रक्रिया २६ जानेवारीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे.
महापौराची थेट निवड
मुंबई महापालिकेत महापौराची थेट निवड होत नाही. निवडून आलेले नगरसेवक आपल्यामधूनच महापौर निवडतात. बहुमत असलेल्या पक्षाचा उमेदवार सहसा महापौर होतो. महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो.
मुंबईचा महापौर हा शहराचा ‘प्रथम नागरिक’ असतो. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद, सभेचे कामकाज सुरळीत चालवणे, लोकशाही पद्धतीने चर्चा आणि निर्णय होतात याची खात्री करणे या त्यांच्या प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय विजयापुरती मर्यादित नसून, पुढील पाच वर्षांत मुंबईचा कारभार कोणत्या दिशेने जाणार याचा निर्णायक टप्पा मानली जात आहे.







