मुंबई: महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ही निवडणूक एकत्र लढणार असून नेत्यांमध्ये यावर एकमत झाले आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या संख्याबळावर ही प्राथमिक चर्चा झाली आहे. ज्या पक्षाचे सदस्य जास्त, त्या पक्षाचा त्या जागेवर दावा, असे सूत्र ठरले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अंतिम बैठकीत यावर अधिकृत निर्णय घेणार आहेत.
कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार?
-
-
भारतीय जनता पक्षाचा (BJP) १२ जागांवर दावा: विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा-गोंदिया आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या जागा भाजपच्या वाट्याला जाऊ शकतात. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर आणि सातारा-सांगली या भागांवरही भाजप दावा करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील नांदेड, लातूर-धाराशीव-बीड, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि अहमदनगर (अहिल्यानगर) या मतदारसंघांतूनही भाजप आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे दिसते.
-
शिवसेनेचा (शिंदे गट) ३ जागांवर जोर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे प्रामुख्याने मुंबईच्या जवळचा ठाणे जिल्हा तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि विदर्भातील यवतमाळ या ३ महत्त्वाच्या जागा राहण्याची शक्यता आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) २ जागांवर लक्ष: अजित पवारच्या राष्ट्रवादीकडे कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मोठा मतदारसंघ आणि मराठवाड्यातील हिंगोली-परभणी ही जागा जाण्याची दाट चिन्हे आहेत.
-
विधानपरिषदेच्या एकूण 17 जागांसाठी 25 मे रोजी अधिसूचना निघणार आहे. इच्छुकांना 1 जूनपर्यंत अर्ज भरता येतील, तर 4 जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. यानंतर 18 जून रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि 22 जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.
सध्याचे राजकीय गणित पाहता या निवडणुकीत महायुतीचे पारडे जड मानले जात आहे. काही जागांवर अदलाबदल देखील होऊ शकते. या जागावाटपामुळे आता राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.







