पुणे : राज्य सरकारने महाराष्ट्रातील देवस्थानसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देवस्थानचे रुपडे पालटणार आहे.अष्टविनायक मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी १४७.८१ कोटी रुपयांसह कोल्हापूरच्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर आणि तुळजापूरच्या तुळजाभवानी देवी मंदिर विकासासाठी भरघोस निधीला मंजुरी देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की,. अष्टविनायकांच्या जीर्णोद्धाराच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून ६ मे २०२५ रोजीच्या चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. त्यानंतर दोन आठवड्यातंच १४७ कोटी ८१ लाख खर्चाचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला आहे.तसेच लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरच्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर येथील विकास कामांसाठीही मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या विकास आराखड्याअंतर्गत श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती, यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती, श्री जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण, डोंगरकड्यांचे संवर्धन, देवस्थान समिती/प्राधिकरणासाठी नवीन कार्यालय, दोन ठिकाणी ज्योतस्तंभाची निर्मिती, नवे तळे परिसर विकसित करणे, केदार विजय गार्डन निर्मिती, यमाई परिसर विकास (चाफेवन) करणे, कर्पूर तलाव संवर्धन आदी कामांना बुधवारी मान्यता देण्यात आली. या कामांवर पहिल्या टप्प्यात २५९.५९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, त्यापैकी ८१.६० कोटींच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत. ही सर्व विकासकामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी ८ कोटी २१ लाख, थेऊरच्या श्रीचिंतामणी मंदिरासाठी ७ कोटी २१ लाख, ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी ७ कोटी ८४ लाख, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी १२ कोटी १४ लाख, रायगड जिल्ह्यातील श्रीवरदविनायक मंदिरासाठी २८ कोटी २४ लाख रुपये, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी २६ कोटी ९० लाख, अहिल्यानगरच्या श्रीसिद्धटेक मंदिरासाठी ९ कोटी ९७ लाख रुपये मंजूर करण्यात आले. विद्युतीकरण, रोषणाई, वास्तूविशारद, जीएसटी आदी खर्चासाठी ४७ कोटी ३९ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यामुळे अष्टविनायक क्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.







