भिगवण(प्रतिनिधी)

Bhigwan : “मृत्यूनंतर किमान सन्मानजनक अंतिम निरोप मिळावा” हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत मानवी हक्क मानला जातो. मात्र तक्रारवाडी येथील स्मशानभूमी आजही अंधारात असल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नातेवाईकांची मोठी कुचंबणा होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. विजेची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने अनेकांना रात्रीच्या वेळी मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात अंत्यविधी पार पाडावे लागत आहेत.
पुनर्वसित गाव, पण स्मशानभूमी मात्र दुर्लक्षित
तक्रारवाडी हे पुनर्वसित गाव असून गावाची स्मशानभूमी उजनी धरणाच्या पाणीफुगवठ्याजवळ, गावापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे. गेली अनेक दशके या ठिकाणी वीजपुरवठ्याची कोणतीही ठोस सोय करण्यात आलेली नाही. दरम्यान अनेक सरपंच सत्तेत आले-गेले; कार्यकाळ पूर्ण करून बाजूला झाले. परंतु स्मशानभूमीतील अंधार दूर करण्याचे धाडस किंवा प्राधान्य कुणीही दिले नाही, अशी ग्रामस्थांची नाराजी आहे.
सोलर हायमास्टही ठरले अपयशी
मध्यंतरी तात्पुरत्या उपाययोजनेतून सोलर हायमास्ट दिवे बसवण्यात आले होते. मात्र काही दिवसांतच हे दिवे बंद पडले. बसविण्याचे काम दिलेल्या ठेकेदाराने त्यांची दुरुस्ती करण्यासाठी कोणतीही पुढाकार घेतला नाही, असा आरोप नागरिक करत आहेत. बंद पडलेले दिवे आजही तिथेच निष्प्रभ उभे असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अंत्यविधीवेळी मंत्र्यांनाही टॉर्चचा आधार
नुकताच एका अंत्यविधीप्रसंगी दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. मात्र स्मशानभूमीत दिवाबत्तीची सोय नसल्याने त्यांनाही काही अंतर मोबाईल टॉर्चच्या उजेडात चालत जावे लागले. राज्याचे मंत्री उपस्थित असतानाही अशी परिस्थिती निर्माण होणे ही तक्रारवाडीकरांसाठी लाजिरवाणी बाब असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
राजकारणाला प्राधान्य, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष?
स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी वीजपुरवठा, रस्ता, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी आहे. मात्र सत्तेच्या खुर्चीसाठी धावपळ करणाऱ्या लोकप्रतिनिधींना गावातील ही खरी अडचण दिसत नाही का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
“अंधार दूर करणारा प्रतिनिधी हवा”
कित्येक वर्षांपासून अंधारात असलेल्या या स्मशानभूमीला कायमस्वरूपी वीजपुरवठा मिळावा, सोलर दिव्यांची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन व्यवस्था उभी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. “गावाच्या वेदना समजून घेणारा आणि स्मशानभूमीला उजेड देणारा सरपंच किंवा सदस्य मिळावा,” अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
तक्रारवाडीतील ही परिस्थिती केवळ प्रशासकीय दुर्लक्षाचे उदाहरण नसून मानवी संवेदनांनाही काळिमा फासणारी आहे. आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.






