Bacchu Kadu : मुंबई, : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम देत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा हाती घेत आहे.”

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडूंना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार का, यावरही राजकीय वर्तुळात चर्चा होती.
यावर बोलताना बच्चू कडूंनी सांगितले की, त्यांनी पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी शिवसेनेने मान्य केल्या आहेत. “शेतकऱ्यांच्या हमीभावात सुधारणा, विधवा महिलांसाठी योजना, तसेच दिव्यांग मंत्रालय बळकट करण्यासंदर्भातील मुद्दे मान्य झाल्यानंतरच मी हा निर्णय घेतला,” असे ते म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, “शिवसेनेची ताकद वाढवताना आम्ही शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांसाठीही तितक्याच ताकदीने काम करू.”
दरम्यान, प्रहार संघटनेच्या भवितव्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, प्रहार सामाजिक आणि दिव्यांग संघटना कायम राहणार आहेत. “ज्यांना राजकारण करायचं आहे ते शिवसेनेत येतील, तर सामाजिक काम करणारे कार्यकर्ते प्रहारमध्येच राहतील,” असे त्यांनी नमूद केले.
भूतकाळाचा उल्लेख करताना बच्चू कडूंनी सांगितले की, त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती. “कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर आम्ही त्यावेळी शिवसेना सोडली होती. आता पुन्हा शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठीच शिवसेनेत परतत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, राणा दाम्पत्याशी असलेले मतभेदही आता संपल्याचे त्यांनी जाहीर केले. “आमचं कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. मुद्द्यांवर मतभेद होतात, पण आम्ही कुस्ती खेळत नाही,” असे म्हणत त्यांनी वादावर पडदा टाकला.






