पुणे : राज्यभर 9 जुलै रोजी झालेल्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या 8 हजार 629 शिक्षकांच्या एका दिवसाचा पगार कपात करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी दिली आहे.

शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील काही शिक्षक संघटनांनी 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलनाचे आवाहन केले होते. या आंदोलनाला राज्यातील अनेक शिक्षकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि नियमित शाळा सुरू राहाव्या यासाठी शासनाने आंदोलनापूर्वीच स्पष्ट भूमिका घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद ठेवू नयेत आणि शैक्षणिक कामकाज नियमित सुरू ठेवावे, असे निर्देश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले होते.

तरीदेखील काही जिल्ह्यांतील शाळांमध्ये शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने मुलांच्या शिकवणीवर परिणाम झाला. यानंतर विभागीय आणि जिल्हास्तरावरून माहिती संकलित करण्यात आली. या अहवालांच्या आधारे राज्यातील एकूण 8 हजार 629 शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांचा एक दिवसाचा पगार कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी शाळा प्रशासन आणि शिक्षकांवर असल्याचे शिक्षण विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. शाळा बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनांबाबत कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे शिक्षक संघटनांकडून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांचे हित आणि सातत्यता लक्षात घेऊनच कारवाई करण्यात आल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे








