अहिल्यानगर: उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि आंब्याचा मोसम म्हटला की घरोघरी आमरसाच्या जेवणाची लगबग सुरू होते. मात्र, याच आमरसाने एका कुटुंबाला थेट मृत्यूच्या दारात उभे केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगरमधील शेवगाव शहरात घडली आहे. बाजारातून आणलेल्या आंब्यांचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार वर्षांच्या चिमुरडीसह तब्बल सात जणांना विषबाधा झाली आहे. या घटनेने आरे वस्ती परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शेवगाव येथील आरे वस्ती भागात राहणारे भाऊसाहेब जगन्नाथ जायभाय यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक बाजारातून आंबे खरेदी केले होते. संपूर्ण कुटुंबाने आंब्यांचा रस करून आनंदाने जेवणाचा आस्वाद घेतला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. आमरस खाल्ल्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना तीव्र चक्कर येणे, शरीराचा तोल जाणे आणि अचानक बेशुद्ध पडणे असा त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ एक सदस्य जागेवरच कोसळू लागल्याने परिसरात एकच घबराट पसरली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने जायभाय कुटुंबातील 7 जणांना रुग्णालयात नेले. दरम्यान, खासगी रुग्णालयातील डॉ. सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांना अन्नातून तीव्र विषबाधा झाली होती. सुदैवाने, वेळेत उपचार मिळाल्यामुळे सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे.
आंबे लवकर पिकवण्यासाठी आणि त्यांना आकर्षक पिवळा रंग आणण्यासाठी अनेकदा ‘कॅल्शियम कार्बाइड’ किंवा इतर घातक रासायनिक औषधांची फवारणी केली जाते. हे रासायनिक अंश पोटात गेल्याने विषबाधा होऊ शकते.







