पुणे, ता. १० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असली, तरी मराठी भाषेबाबत समोर आलेली आकडेवारी शिक्षण क्षेत्रासाठी चिंतेची घंटा ठरत आहे. राज्यभरात तब्बल ९४ हजारांहून अधिक विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाल्याने शिक्षणतज्ज्ञ, पालक आणि भाषा अभ्यासकांमध्ये गंभीर चर्चा सुरू झाली आहे. SSC RESULT
यंदाच्या एसएससी परीक्षेसाठी मराठी प्रथम भाषा विषयात १० लाख ९८ हजार ६२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १० लाख ६ हजार ८९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९२.५७ इतकी नोंदवली गेली. मात्र, तब्बल ८० हजार ८०३ विद्यार्थी मराठी प्रथम भाषेत नापास झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असलेल्या मराठी विषयात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अपयशी ठरणे ही गंभीर बाब मानली जात आहे. SSC RESULT

याशिवाय मराठी विषयाची द्वितीय किंवा तृतीय भाषा म्हणून निवड केलेल्या ४ लाख १३ हजार ९१७ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ७४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यामुळे सर्व श्रेणी मिळून जवळपास ९४ हजार ५४४ विद्यार्थ्यांना मराठी विषयात अपयश आले आहे. SSC RESULT
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, हा केवळ अभ्यासातील कमकुवतपणाचा प्रश्न नसून बदलत्या सामाजिक आणि भाषिक वातावरणाचे संकेत आहेत. शहरीकरण, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रमाण आणि घराघरात इंग्रजी-हिंदीचा वाढता वापर यामुळे विद्यार्थ्यांचा मराठी भाषेशी असलेला दैनंदिन संपर्क कमी होत चालल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’चा दर्जा दिल्यानंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. मातृभाषेचे संवर्धन, प्रादेशिक भाषांचे जतन आणि इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रभावामध्ये संतुलन राखण्याचे मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेसमोर उभे ठाकले आहे. SSC RESULT
काही शिक्षकांच्या मते, विज्ञान आणि गणितासारख्या विषयांच्या तुलनेत भाषा विषयांना कमी महत्त्व दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारीही अपुरी राहते. तर काही शिक्षणतज्ज्ञ भाषा शिकवण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. “भाषा शिक्षण अधिक परीक्षाभिमुख झाले असून साहित्य, संस्कृती आणि संवादाशी असलेली त्याची नाळ कमकुवत होत आहे,” असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. SSC RESULT
मराठी भाषेच्या भवितव्याबाबत चिंता वाढत असताना, विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढवणे, शाळांमधील अध्यापन पद्धती बदलणे आणि घराघरात मराठीचा वापर वाढवणे आवश्यक असल्याचे मत आता जोर धरू लागले आहे. SSC RESULT







