पुणे : कात्रज परिसरातील साई सिध्दी चौकात शुक्रवारी (११ जुलै) रात्री पानटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून २५ वर्षीय तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

खून झालेल्या तरुणाचे नाव आर्यन साळवे (वय २५, रा. सटाणा, नाशिक) असे असून, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धैर्यशील मोरे (वय ३०, रा. साई सिध्दी चौक, कात्रज) असे आहे.

घटनेचा तपशील :
आर्यन साळवे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सटाण्याचा रहिवासी असून, तो अलीकडे आपल्या मामाकडे धनकवडीतील आंबेगाव पठार परिसरात राहण्यासाठी आला होता. तो कात्रजमधील एका केशकर्तनालयात नोकरी करत होता.
शुक्रवारी रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास आर्यन साई सिध्दी चौकातील एका पानटपरीवर पान खाण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आरोपी धैर्यशील मोरे पानटपरीवर सिगारेट ओढत होता. धैर्यशीलने आर्यनकडे संशयित नजरेने पाहिल्याने त्यांच्यात वाद झाला. वाद इतका वाढला की, धैर्यशीलने अचानक आर्यनवर कोयत्याने वार केला.
आर्यनने बचाव करण्याचा प्रयत्न करताना हातावर वार झेलला, त्यामुळे त्याची बोटे तुटली. त्यानंतर आरोपीने त्याच्या डोक्यावर घातक वार केला. या गंभीर जखमेमुळे आर्यन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलीस कारवाई :
घटनेनंतर तत्काळ कारवाई करत भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरेला अटक केली. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियंका निकम करत आहेत.







