Crime : राज्यात दूध भेसळीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नरहरी झिरवळ यांच्या अखत्यारीतील अन्न व औषध प्रशासन विभाग आधीच एका कथित ‘लाच’ प्रकरणामुळे चर्चेत असताना, आता अहिल्यानगर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या कारवाईने या विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जाणारे केमिकल जप्त करण्यात आले. फक्राबाद येथील एका दूध संकलन केंद्रावर ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर छापा टाकण्यात आला. विशेष म्हणजे, कारवाई गुप्त ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनाही शेवटपर्यंत ठिकाणाची माहिती देण्यात आली नव्हती.
छाप्यात १,१९८ लिटर पॅराफिन ऑइल, ३०० किलो पांढरी पावडर आणि केमिकलपासून तयार केलेले ३२० लिटर दूध असा साठा आढळला. तपासणीत या सहा ड्रममधील केमिकलपासून तब्बल २४ हजार लिटर बनावट दूध तयार होऊ शकते, असे उघड झाले. तज्ज्ञांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार हे दूध मानवी आरोग्यास घातक ठरू शकते. एकूण १७ लाख ३२ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचे राजकीय परिणामही उमटू लागले आहेत. दूध आणि अन्नपदार्थातील भेसळ रोखण्याची जबाबदारी ज्या विभागाकडे आहे, त्यांना माहिती न मिळता पोलिसांनी कारवाई करावी लागणे, ही बाब चिंताजनक मानली जाते. गृह विभागाची जबाबदारी सांभाळणारे Devendra Fadnavis यांच्या अखत्यारीतील पोलिस यंत्रणेला पुढाकार घ्यावा लागल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या स्थानिक कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दूध हा दैनंदिन वापरातील अन्नघटक असल्याने अशा भेसळीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे या कारवाईनंतर केवळ दोषींवर कारवाईच नव्हे, तर अन्नसुरक्षा यंत्रणेची जबाबदारी आणि उत्तरदायित्व यावरही व्यापक चर्चा होणे गरजेचे ठरत आहे.







