पुणे: फुरसुंगी परिसरातील पापडेवस्तीत मंगळवारी (दि. 26) सकाळी घडलेल्या घटनेने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. जनावरांच्या ताब्याच्या मुद्द्यावर आमदार सदाभाऊ खोत गोशाळेत शेतकऱ्यांसोबत पाहणीसाठी गेले असता काही गोरक्षकांनी त्यांना अडवण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली. मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेमुळे गोरक्षकांचा अतिरेक आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महिन्याभरापूर्वी सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही गोरक्षकांनी 21 जनावरे (म्हशी व रेडकू) पकडून ती फुरसुंगीतील गोशाळेत ठेवली होती. मात्र, न्यायालयाने नुकतेच ही जनावरे पुन्हा शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सदाभाऊ खोत शेतकऱ्यांसह गोशाळेत गेले असता त्यांना ती जनावरे आढळून आली नाहीत. यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना काही गोरक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि खोत यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी तातडीने गोरक्षकांना रोखले, त्यामुळे हाणामारी टळली.
घटनेनंतर पोलिसांनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ताब्यात घेतले असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मात्र धक्काबुक्की झाल्याचे नाकारले असून फक्त गोंधळ निर्माण झाल्याची माहिती दिली आहे. तरीसुद्धा सत्ताधारी पक्षातील आमदारावर सार्वजनिक कार्यक्रमस्थळी हल्ल्याचा प्रयत्न होणे ही गंभीर बाब असल्याचे मानले जात आहे.
सदाभाऊ खोत हे मागील काही दिवसांपासून गोरक्षकांच्या अतिरेकाविरोधात सातत्याने बोलत आहेत. “शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवणाऱ्या, कायद्याच्या आडून जनावरे जप्त करणाऱ्या गोरक्षकांवर कडक कारवाई झाली पाहिजे,” अशी त्यांची मागणी आहे. घटनेनंतर त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात जाऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निवेदन दिले. यावेळी राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, दत्ता ढगे, डॉ. अब्दुल समत, गुलाब पवार, सुहास पाटील, बाबु बुधावले यांसारख्या शेतकरी नेत्यांचीही उपस्थिती होती. या नेत्यांनी “गोरक्षक प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करावी” अशी मागणी केली.
राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू आहे. मात्र, त्याच्या आडून स्वयंघोषित गोरक्षक गरीब शेतकऱ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी येत आहेत. अशा पद्धतीने अडवणूक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खोत यांनीही याच मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी याबाबत शेतकरी नेत्यांची बैठक घ्यावी, अशी मागणी केली आहे.
फुरसुंगीतील ताजी घटना ही फक्त एका आमदाराला धक्काबुक्की करण्याच्या प्रयत्नापुरती मर्यादित नसून शेतकरी-गोरक्षक संघर्ष किती तीव्र होत चालला आहे, याचे प्रतीक मानले जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणी होणाऱ्या कारवाईकडे राज्याचे लक्ष लागले आहे.







